Ellora Publications

Ellora Publications

Share

Ellora Publications Is Books Publication And Distribution Organisation.

03/11/2024

#डॉ_प्रकाश_कोयाडे जगातील सर्वात सुंदर जागा म्हणजे आयसीयु! दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म, जात, वर्ण, श्रीमंत, गरीब...‌एवढंच नाही तर निसर्गाने तयार केलेला स्त्री, पुरुष हा भेदही इथं नसतो!
तो काचेचा दरवाजा ओलांडून मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडतात तिथेच गळून पडतात, मध्ये फक्त मानवी शरीर जातं!
आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू असतील... पण जो अर्थ , जे तत्वज्ञान इथं आयसीयुमध्ये मिळतं, ते कुठेच वाचायला मिळत नाही! आयुष्याचा अर्थ कळतो!
म्हणून ही जागा फार सुंदर आहे...
एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. इथं आयसीयुच्या एकेका बेडवर आजवर शंभर, दोनशे... असंख्य लोक मेलेले असतात! कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला... एवढं सोप्पं असतंय तिथं!
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध...‌ आस्तिक, नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशिनमधून ऑक्सिजन जात असतो!
आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो, कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, मेकअप बिघडला का, लोक हसतील माझ्या अवताराला, बोलण्याला, भाषेला... इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. नाकातला शेंबूड दिसू नये म्हणून दिवसभर कळत नकळत आपला आटापिटा सुरू असतो... तिथं हगणं, मुतणं माफ असतं! पुरुष असो की स्त्री... लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते!
वेळेची खरी किंमतही सर्वात जास्त इथेच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते... फक्त आणखी एक दिवस, एक तास, अजून पाच मिनिटं मिळावी...
बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वत: कडून, इतरांकडून... अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा...‌ असंख्य अपेक्षा!
तिथे फक्त एकच अपेक्षा असते... फक्त एकदा डोळे उघड!

आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं... घमंड उतरतो! कधी वाटलंच की, माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं आहे तेव्हाही जायचं... आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे!
निसर्गाने माणूस निर्माण करतेवेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील 'माणूस' मला तिथे दिसतो...
म्हणून ही जागा जगात सर्वात सुंदर आहे!

डॉ. प्रकाश कोयाडे
लेखक: #प्रतिपश्चंद्र , #केदारनाथ१७जून

26/10/2024

डॉ. प्रकाश कोयाडे यांचा लेख: परवा एका तेरा वर्षांच्या मुलानं गळफास घेतला. त्याने जे काही केलं त्यापेक्षाही त्याने तसं का केलं हे फार महत्त्वाचं आहे. झालं असं की, दोन सख्खे भाऊ घरात खेळत होते.‌ एकाचं वय वर्षे तेरा आणि दुसरा पंधरा. खेळता खेळता दोघांत भांडण झालं आणि जो लहान भाऊ होता त्याने रागात पंख्याला ओढणी लावून फाशी घेतली. मोठा भाऊ ओरडला, सुदैवाने कोणीतरी आलं. ताबडतोब त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आणि मुलगा वाचला.
काही महिन्यांपूर्वी मी एक पोस्ट लिहिली होती ज्यामध्ये आईने हातातून मोबाईल ओढून घेतला म्हणून मुलाने गळफास लावून आत्महत्या केली.
तीन दिवसांपुर्वी एका चौदा वर्षांच्या मुलीनं तिचे वडील रागात बोलले म्हणून गळफास घेतला... ती मेली! फक्त चौदा वर्षाची मुलगी!

गेल्या काही महिन्यांत माझ्या बघण्यात या तीन गोष्टी आल्या. प्रत्यक्षात कितीतरी अशा घटना घडत असतील. खेळता खेळता भावाने मारलं म्हणून त्याने फाशी घेतली हे भयंकर आहेच पण फाशी कशी घ्यायची हे शाळेतल्या मुलांना कळतं कुठून हे फार भयंकर आहे! चौदा वर्षांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीला राग येऊन डोक्यात आत्महत्येचा विचार येतो आणि पटकन त्याचा निर्णय होतो. मृत्यू होतो!

भारतीय NCRB (National Crime Records Bureau) चे रिपोर्ट गुगल करा, भयंकर आकडेवारी समोर येईल. २०२० नंतर अठरा वर्षाच्या खालील मुलांच्या आत्महत्मेत ६.२ टक्के वाढ झालीय. २०२१ मध्ये १०,७३० आत्महत्या या शाळकरी मुलांनी केल्या आहेत. दरवर्षी ही टक्केवारी वाढत आहे.

आपल्या लहानपणी किंवा पंधरा वीस वर्षापूर्वी अशा घटना कधी ऐकल्या होत्या का? आपल्या मनात लहानपणी असा इतक्या टोकाचा विचार कधी येत होता का? नेमकं काय बदललं इतक्या वर्षात?

त्याचं उत्तर मोबाईल असेल तर हा एक अलार्म आहे! घरातील मूल स्वतःच एक बॉम्ब आहे आणि त्याचं बोट ट्रिगरवर अर्थात मोबाईलवर आहे! एकानंतर एक येणाऱ्या रील्स मुलांमधील संयम संपवत आहेत... थांबायचं कठं हे त्यांना कळत नाही! एखाद्या हॉलिवूड चित्रपटात दाखवतात तसं व्हायरस हळूहळू घराघरात पसरतोय. आपण आपल्या कामात व्यस्त आहोत, पैसा कमवायचाय, धावपळ आहे. शेअर मार्केट, निवडणुका, बातम्या, दवाखाना, सणवार, नाते गोते, नोकरी, पुस्तकं, भांडणं...‌ शेकडो गोष्टींनी आपलं आयुष्य व्यापलं आहे.
या व्यस्त आयुष्यात आपल्या घरातलं मूल नकळत अडकत चाललंय. क्षणाक्षणाला त्याच्या डोक्यात काहीतरी साचत चाललंय. ते मोबाईलवर काय बघतंय यावर आपलं नियंत्रण नाही. संयम राहिला नाही... आणि अगदी शुल्लक कारणावरून आत्महत्येच्या घटना घडत आहेत.

ती १४ वर्षाची मुलगी निपचित पडून होती, डोळे अर्धवट मिटलेले होते, गळ्यावर मोठी खूण होती. तिला मृत घोषित करताना अंगावर काटा येतो होता. आईवडील एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते.‌ तिला रागावलो म्हणून वडील पश्चातापाने चिडत होते, केस ओढून घेत स्वतःला दोष देत होते.
त्यांना जाणीव नव्हती की हे एका दिवसात घडलेलं नाही. आज ना उद्या ते होणारच होतं... सुरूवात फार आधीपासून झाली होती!

#डॉ_प्रकाश_कोयाडे

लेखक
#प्रतिपश्चंद्र #केदारनाथ१७जून

06/08/2024

एलोरा पब्लिकेशन्स कडून स्वागत 🙏🏼

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Richwood Society
Pune
411019