DR. Prabhakar R. Londhe
जेव्हा स्वतःवरील विश्वास दृढ होत जातो, तोच क्षण माणसाला यशाकडे घेऊन जात असतो.
डॉ प्रभाकर लोंढे
16/03/2026
(सुभेदार मल्हारराव होळकर जयंती विशेष)
विनम्र अभिवादन!
अवश्य वाचा.....
सुभेदार मल्हारराव कळेल काय???
डॉ प्रभाकर लोंढे
पेशवाईचा आधारस्तंभ, माळव्याचा सुभेदार, दुश्मनांचा कर्दनकाळ, पराक्रमाचा महामेरु, रणांगणावरील तोफगोळा, अस्सल ध्येयवेडा, ज्यांचं नाव घेताच दुश्मन म्हणती पळा.. पळा. असे ते महान सुभेदार मल्हारराव खंडोजी होळकर यांची आज जयंती.. .... जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन व वाचकांना खूप खूप शुभेच्छा....
पेशवाईची स्थापना करणारा बाळाजी विश्वनाथ पेशवा ज्याने पेशवाईची घडी या महाराष्ट्रात निर्माण केली, त्याच्या कळस बाजीराव पेशवा, नानासाहेब पेशवा, माधवराव पेशवा, राघोबा पेशवा, चिमाजीआप्पा, सदाशिवराव पेशवा यांनी रचला. तो कळस ज्यांच्या ज्यांच्या जीवावर रचला गेला, ज्यांच्या भरोशावर पेशवाई मजबूत झाली, त्या सर्वांचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजेच सुभेदार मल्हारराव होळकर ..... ज्यांनी अखंड महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये पेशवाईच्या नावाचा कसला? होळकरशाहीच्या नीती व कर्तृत्वाचा दबदबा निर्माण केला, युद्धनीती व तलवारीच्या पात्याला गरजेनुरुप धार देत दुश्मनावर विजय मिळवला. स्वत:ची दहशत निर्माण केली व कायम ठेवली.. तो नीती संपन्न, कृती संपन्न सुभेदार आम्हाला कळेल काय?
पेशव्यांच्या अंतर्गत वादात निर्णायक भूमिका घेऊन अतिहुशार समजल्या जाणाऱ्या पेशव्यांना प्रसंगी समजच नाही तर गरजेनुसार ज्यांनी दम सुद्धा दिला, नीतिभ्रष्ट पेशव्यांना गरजे नुसार नीतीचे धडे दिले, तरी सुद्धा पेशव्यांना जीवनभर मालक म्हणून स्वामीभक्ती केली. इमाने इतबारे चाकरी करताना स्वतःचा स्वाभिमान यत्किंचितही ढळू न देणारे, स्वामीभक्ती जपतांना स्वकियांचा तो सूभेदार आम्हाला कळेल काय?
प्रतिगामी समाजव्यवस्थेमध्ये अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांना विरोध करून सत्याची कास व राज्याचा सर्वांगीण विकास यासाठी पुरोगामी धोरण स्विकारणारा, राज्य विकासामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांच्या क्षमता, कर्तुत्व यावर विश्वास ठेवून त्यांना तशा प्रकारची संधी उपलब्ध करून देणारा, सुनेच्या हातात राज्याची चाबीच नाही तर विकासाची जबाबदारी देणारा, वेळ प्रसंगी स्त्रियांचा "अब्रुरक्षक" म्हणून सर्वत्र नावलौकिक प्राप्त झालेला सुभेदार मल्हारराव होळकर आम्हाला कळेल काय?
ज्यांनी आपल्या कार्यकाळात अनेकांना मदत केली. अनेकांची गेलेली राज्य परत मिळवून दिली. राजपूताण्या सारख्या भागातील राजकीय हालचालीवर ज्यांच्या वचक राहिला, ज्यांच्या विचार, कृती व निर्देशांचा दबदबा निर्माण झाला व सातत्याने टिकून राहीला, म्हणूनच राजस्थानच्या इतिहासात त्यांना "राज्य संस्थापक मल्हारराव होळकर" असे म्हटले जाते, असा तो राज्य संस्थापक सुभेदार मल्हारराव आम्हाला कळेल काय?
भारतातील सर्वात समृद्ध संस्थानाचा संस्थापक, ज्या संस्थानांमध्ये कायदा हा प्रमाण होता, जनभावनेचा आदर व लोक कल्याणाचा ध्यास हाच ज्यांच्या राज्याचा श्वास होता. अशाप्रकारे जे आपल्या राज्याची घडी बसून राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव दक्ष असलेल्या संस्थानाची वैचारिक घडी बसविणारा थोर सुभेदार मल्हारराव होळकर मोठ्या अंतकरणाने राष्ट्रीय भावनेने, असीम पराक्रमाच्या प्रेरणा घेण्याच्या दृष्टीने आम्हाला कळेल काय?
सुभेदार मल्हारराव होळकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या पराक्रम व स्मृतींना विनम्र अभिवादन!!!
डॉ. प्रभाकर लोंढे
नागपुर
१६ मार्च २०२६
06/03/2026
My sweet family.... Evergreen family..
Enjoyable family...
05/03/2026
आदरणीय रामरावजी वडकुते म्हणजेच धनगरांचे काशीराव..
डॉ प्रभाकर लोंढे
आदरणीय रामरावजी वडकुते साहेब यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल प्रथमता त्यांचे मनःपूर्वक त्रिवार अभिनंदन!!! परंतु ही उमेदवारी घोषित होताच धनगर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या.
स्वतः वडकुते साहेबांनी म्हटले की, "मी न मागताच मला राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे." दुसरीकडे अनेक धनगर नेतृत्व राज्यसभेच्या उमेदवारीसाठीच नव्हे तर प्रतिनिधित्वासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असताना सुद्धा त्यांना ती दिल्या गेलेली नाही. काहींनी ती समाजाच्या नावावर उपभोगली असली तरी त्यांच्या इच्छा तृप्त झालेल्या दिसत नाहीत.
अनेक तरुण आत्मविश्वासू धनगर नेतृत्व, सर्वगुणसंपन्न, सामाजिक भान, राजकीय जाण असलेल्या कर्तबगार धनगर नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी टाळ्ल्या गेली, हा धनगर जमातीच्या प्रत्येकाला विचार करायला लावणारा अतिशय मोठा गहन प्रश्न आहे.
या प्रश्नाचं उत्तर मी देण्यापेक्षा सर्वांनी विचार करावा, त्यासाठी पुढील ऐतिहासिक संदर्भ वाचावा... समजून घ्यावा... आणि कृतीयुक्त कार्यक्रम राबवून पराक्रमी यशवंतराव महाराज बनता येते का? जन्माला घालता येते का? यासाठी प्रयत्न करावा त्या दृष्टीने प्रत्येकाला शुभेच्छा..
++++???++++ वाचा
होळकरशाहीचा दबदबा अनुभवलेल्या भारतावरील इंग्रजांच्या रुपाने एकीकडे संकट, पेशवाईचा (ब्राम्हण) उन्माद व मराठेशाहीचा (मराठे- शिंदे) अतिरेक झाला असताना होळकरशाहीची (धनगर) अस्मिता धुळीस मिळविण्याचा प्रयत्न कदाचित हेतुपुरस्सरपणे या दोघांकडून (शिंदे व पेशवे) संगनमताने सुरू होता. थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मृत्युपासूनच त्यांची नियत फिरलेली होती. कर्तबगार राजमाता अहिल्याबाई होळकरांनी या दोघांनाही (पेशवे शिंदे प्रवृत्तीला) जोरदार धडा शिकविला. पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या मृत्यूनंतर होळकर साम्राज्य सांभाळण्याचे महान कार्य महाराज तुकोजीराव होळकर यांनी केले. केवळ दोनच वर्षात महाराज तुकोजीराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यांचे १) काशीराव, २) दुसरे मल्हारराव, ३) विठोजीराव व ४) यशवंतराव असे चार मुले होती. परंतु त्यांना दासीपुत्र, अनौरस संतती अशा नावाने हेतुपुरस्सर हीनवण्याचा व होळकर वंशात भांडणे लागतील, या दृष्टीने वारंवार प्रयत्न केला जात होता. तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर वारसा संबंधाने होळकरशाही मध्ये हेतूपुरस्सर कलह माजविला गेला. त्यासाठी साम, दाम, दंड, नीती, भेद या सर्वांचाच सहारा घेतला गेला, यातून पेटलेला संघर्ष इतका महाभयंकर होता की, पेशव्याकडून शनिवारवाड्यावर विठोजी राजेंचा निर्दयपणे खून करण्यात आला. शिंदे यांच्या सैनिकाकडून झालेल्या अचानक हल्ल्यामध्ये मल्हारराव दुसरा मारला गेला. दोन कर्तबगार भाऊ मारले गेले. सोबतच होळकर वंशातील स्त्रिया- मुलांना बंदिवासात टाकण्यात आले. आपल्या हातात काही लागेल या आशेवर होळकर वंशज काशीराव पेशव्यांच्या गोटात जावून बसला व त्यांच्या इशाऱ्यावर नाचत होता. आता होळकर साम्राज्य आशा बाळगू शकेल असा फक्त यशवंतराव बाकी होता.
कर्तबगार होळकर राजवंशाची वाताहत झाली होती. या सर्व शडयंत्रामागे फक्त एकच उद्देश होता हे स्पष्ट होते, तो म्हणजे होळकरांचा (धनगरांचा) राजकीय वारसा समाप्त करणे. त्यावेळी होळकर राजवंशातील लोक सुद्धा त्याला तितकेच जबाबदार होते ही बाब विसरून चालणार नाही. त्यांनी स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा आपल्या अस्मितेला महत्त्व दिले असते तर कदाचित ही वेळ आली नसती.
एकूण प्रकरणांत होळकर राजवंशातील अस्थिरतेला खतपाणी घालण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रयत्न सातत्याने पेशव्यांनी व दौलतराव शिंदे कडून झाले. त्यांची संपूर्ण नजर होळकर साम्राज्याच्या समृद्धीवर होती. त्यांनी दुबळ्या काशीरावाला हाताशी धरून होळकरांचे एक एक महाल ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. तोपर्यंत मालक पेशवे आपल्याला होळकर राजगादीचा वारस घोषित करतील या खोट्या आशावादात होळकर वंशज काशीराव जगत होता. तोपर्यंत त्याच्या माध्यमातून होळकरांचे प्रदेश, महाल ताब्यात घेण्याचा सपाटा शिंद्यांनी लावला होता, ही बाब त्याच्या लक्षात आली नाही.
या सर्व बाबींमुळे होळकरशाही लयास जाते की काय? असा प्रश्न निर्माण झाला. असे असताना तो प्रश्न यशवंतरावांच्या स्वाभिमानाला डिवचत होता. त्यातून महान पराक्रमी यशवंतराव होळकरशाहीचा तारणहार म्हणून पुढे आला. त्यानी आपली सुटका करून घेतली व स्वत:चं सैन्य उभारलं. होळकरांचे शिंद्यांनी ताब्यात घेतलेले प्रत्येक प्रदेश मुक्त करण्याचा जणू काही विडाच त्यांनी उचलला. पेशवे शिंद्यांची दानादान उडवत होळकरशाहीला पुनर्वेभव मिळवून देत सोबतच भारतात राष्ट्रीय भावना सुद्धा जपण्याचा प्रयत्न केला. इंग्रज भारतात स्थिरावणार नाही, यासाठीच स्वातंत्र्य संग्राम उभारणारा प्रथम भारतीय स्वातंत्र्ययोध्दा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहासात उल्लेख केला जातो. यासाठी फक्त तुम्हाला भारतीय ऐतिहासिक साधना सोबतच परदेशी ऐतिहासिक साधनांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल.
डॉ. प्रभाकर लोंढे
(नागपूर)
(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक.)
प्रेम कविता
एक अतिशय महत्त्वाची प्रेमाची व्याख्या करणारी अर्थपूर्ण कविता
खंडेराव होळकर यांच्या मृत्यूचा संदर्भ
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Yavatmal
445308
06/02/2026